‘…तोल गेला की माणसं अशी बेफाम बोलायला लागतात’; नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या टीकेवर असंसदीय शब्द असल्याचं म्हणत भाजपाकडून निशाणा साधण्यात आला आहे. एकीकडे ईडीनं संजय राऊतांची मालमत्ता जप्त केली असताना दुसरीकडे राऊतांनी देखील सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेत घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांवर केला आहे. या संदर्भात आता भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

“दोन दिवस बातम्या मी पाहिल्या. त्यात सन्माननीय संजय राऊत यांनी जे विचार मांडले, ते पाहाता पत्रकार परिषदेत जी भाषा वापरली, शिव्या घालण्यात आल्या, ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या घालतो, त्या मी उच्चारू इच्छित नाही”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

पुढे नारायण राणे म्हणाले की, “म्हणे शिवसेना कुणाला घाबरत नाही. पण तुम्ही कधी शिवसैनिक होतात? संपादक म्हणून आलात तुम्ही पगारधारी नोकरदार म्हणून. तोल गेला की माणसं अशी बेफाम बोलायला लागतात. तेच संजय राऊतांच्या बाबतीत झालंय. पक्ष वाढवण्यासाठी हे विचार आहेत की पक्ष संपवण्यासाठी याचा विचार त्यांचे पक्षप्रमुख करतील”.

“पुढच्या वेळी आंदोलन होईल की यशवंत जाधव यांच्यावर चुकीची रेड टाकण्यात आली. कारण शिवसेनेचा पैसे खाण्याचा धंदा आहे. संजय राऊत सांगू शकतील हे सुद्धा. काही तारतम्य नाही. शुद्धीवर असलेला माणूस असं काही बोलू शकत नाही. राज्याच्या प्रश्नांकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं म्हणून संजय राऊतांना सोडून दिलं आहे. कशाही उड्या मारा”, असंही नारायण राणे म्हणाले.

Sumitra nalawade: