बंगळूरू : (Amit Shah On Mallikarjun Kharge) : काँग्रेसकडे (Congress) निवडणूक लढवायला नेता नाही, म्हणून दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उधार नेत्यांच्या जीवावर मैदानात उतरली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली. कर्नाटकातील बागलकोटमध्ये दुपारी 35 अंश तापमानात अमित शाह (Amit Shah) यांचे भाषण सुरू होते. यावेळी अमित शाहांनी काँग्रेससोबतच भाजप सोडून गेलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला.
निवडणुकीसाठी भाजप (BJP) सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांवर ते अवलंबून आहेत, यातूनच काँग्रेसची दिवाळखोरी कळते असे अमित शाह भाषणात म्हणाले. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने शेट्टर यांनी नुकताच पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हुबळी सेंट्रल विधानसभेतून काँग्रेसने शेट्टर यांना तिकीट दिले आहे. शेट्टर यांच्याशिवाय भाजपमधून आलेल्या लक्ष्मण सवदी यांनाही काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. यावेळी शाह यांनी दोन्ही नेत्यांवर निशाणा साधला आहे.
कर्नाटकातील 224 जागांसाठी काँग्रेस, भाजप आणि जेडीएसने उमेदवार जाहीर केले आहेत. जेडीएसने सर्वाधिक 28 पक्षांतर केलेल्या नेत्यांना तिकीट दिले आहे. भाजपने इतर पक्षातून आलेल्या 17 नेत्यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसने यावेळी पक्षांतर करणाऱ्यांना सर्वात कमी तिकिटे दिली आहेत. पक्षाने एकूण सहा तिकिटे इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना दिली आहेत. त्यामध्ये शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांच्या नावाचा समावेश आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले होते की, भाजपमधून 150 लोक येण्यास तयार आहेत, पण आमच्याकडे जागा नाही, त्यामुळे सर्वांनाच घेतले जात नाही. गेल्या पाच वर्षात पक्षांतर करणाऱ्यांमुळे भाजपला तीन राज्यात सरकार बनवता आले. कर्नाटकमध्ये 2019 मध्ये प्रथम कुमारस्वामी यांचे सरकार पडले आणि भाजपचे सरकार स्थापन झाले.
कर्नाटकानंतर मध्य प्रदेशातही 2019 मध्येच काँग्रेसचे सरकार पाडण्यात आलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 27 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले. नऊ महिन्यापुर्वी महाराष्ट्रातही भाजपचे सरकार पक्षांतर करणाऱ्यांमुळेच स्थापन झाले. 2022 मध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. यानंतर शिंदेंनी भाजपसोबत युती केली आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले.