लातूर : (Electricity collection of farm pump was broken) आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता महावितरणाने जोराचा झटका दिला आहे. कारण लातूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 हजार कृषिपंपांची वीजपुरवठा खंडीत करण्यात आली आहे. सद्या रब्बीचा हंगामा सुरु असून, पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच महावितरणाकडून वीजबिल थकीत असल्याचे कारण देत शेतकऱ्यांची वीज खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.
लातूर परिमंडळात लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश होतो. तर लातूर परिमंडळात कृषी पंपाचे 5 हजार 800 कोटींचे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील 18 हजार 667 पेक्षा अधिक कृषिपंपांचे विद्युत कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी वीज बिलाची होळी करत या कारवाईचा निषेध केला आहे.
थकीत वीजबिल तत्काळ भरा अन्यथा वीज पुरवठा तोडण्यात येणार अशी भूमिका महावितरण कंपनीने घेतलीय. एवढचं नाही तर महावितरणाकडून प्रत्यक्षात कारवाईला सुरवात झाली असून, लातूर परीमंडलातील 18 हजार 667 पेक्षा अधिक कृषिपंपांचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आले आहे.