मुंबई | Actor Manoj Joshi – बाॅलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते चांगलेच संतापले आहेत. त्यांच्या चिडण्याचं कारण तितकंच गंभीर होतं. एअर इंडिया (AIR INDIA) या विमान कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे मनोज जोशी यांना राग अनावर झाला. यासंदर्भातला एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
मनोज जोशी यांनी मुंबई विमानतळावरील लगेज बेल्टजवळ एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “मी प्रवास करत असलेले विमान जवळपास तीन तास उशिरा उडाले. त्यानंतर आता सामान घेण्यासाठी मी गेल्या 45-50 मिनिटांपासून लगेज बेल्टजवळ उभा आहे, पण माझं सामान अजूनही आलेलं नाही. एवढंच नाही तर तिथे एअर इंडियाचा एकही कर्मचारी नाही, ज्यांच्याशी संपर्क मला साधता येईल. त्यासोबतच “एअर इंडिया कधी सुधारणार आहे की नाही?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मनोज जोशी यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “एअर इंडियाची फ्लाइट 634 भोपाळहून 3 तास उशिरा निघाली आणि आता मी 40 मिनिटे मुंबईत लगेज बेल्टजवळ उभा आहे. त्यासोबतच इथे एअर इंडियाचा एकही कर्मचारी नाही. इतकी वाईट सेवा मी आत्तापर्यंत कधीच अनुभवली नाही. त्यांनी माझा संपूर्ण दिवस खराब केला. याची नुकसान भरपाई कोण देणार?”
दरम्यान, मनोज जोशींच्या या ट्विटला विमान कंपनीच्या व्यवस्थापकांनी उत्तर दिलं आहे. “प्रिय मनोज जोशी, आम्हाला आशा आहे की तुम्हाला तुमचं सामान मिळालं असेल. निश्चिंत राहा, आम्ही तुमचा अभिप्राय विमानतळ टीमपर्यंत पोहोचवला आहे. आम्ही त्याचा आढावा घेत आहोत. आम्ही आशा करतो की पुढच्या वेळी तुम्हाला अधिक चांगली सेवा देऊ शकू”, असं एअर इंडियाच्या वतीनं लिहिलं होतं.