मुंबई | Aaditya Thackeray – बुधवारी (30 नोव्हेंबर) सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी खळबजनक वक्तव्य केलं. लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत केलेल्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विटद्वारे शिंदे सरकारवर (Shinde Government) सडकून टीका केली आहे.
“इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!”, अशा खोचक शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले तसंच शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. औरंगजेबानं शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले तर शिंदे महाराष्ट्रासाठी”, असं वक्तव्य मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.