मुंबई : (Arvind Sawatn On Eknath Shinde Group) शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपली भूमिक मांडली आहे. पाठीत खुपसण्यासाठी काहीतरी शस्त्र हवं होतं, ते शस्त्र शिंदे गटाला देण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.
आमच्या हातात मार्ग दाखवणारं चिन्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रात्री-अपरात्री एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना मार्ग दाखवण्यासाठी मशाल वापरली जात होती. गड जिंकल्यावरदेखील एकमेकांना संदेश पोहचवण्यासाठी मशाल पेटवली जात होती. सध्या देशाला दिशा दाखवण्याची गरज आहे, यांनी देशाची दशा केली आहे. यांना दिशा दाखवण्यासाठी मशालच आवश्यक आहे, ती मशाल आम्हाला मिळाली याचा आम्हाला अतिशय आनंद आहे, असंही सावंत म्हणाले.
शिंदे गटाला इशारा देत अरविंद सावंत पुढे म्हणाले, “आमच्या हाती मशाल आहे. तुम्ही जळून खाक व्हाल. आमची मशाल साधी नाही. तुम्ही जवळही येऊ शकणार नाही. आमच्या मशालीची धगही तुम्ही सहन करू शकणार नाही. तेव्हा आमच्या हातात मशाल नव्हती म्हणून तुम्ही पाठीत वार केला.”