वारीची परंपरा शतकानुशतके सुरूच…
ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यासारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. गेली कित्येक शतके सुरू असलेली ही महाराष्ट्राची परंपरा आता देशातच नव्हे, तर विश्वात लोकप्रिय झाली आहे.
पुणे : आषाढ महिना आणि वारीचे काही विशेष नाते आहे. लाखो वारकरी देहू आणि आळंदीत जमा होतात. डोईवर तुळशी वृंदावन व विठ्ठल रुखमाईच्या मूर्ती, हाती टाळ मृदंग, मुखी विठ्ठल, विठ्ठल जयहरी विठ्ठलाचा गजर करीत, ज्ञानोबा- तुकारामांचा जयघोष करीत व खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका फडकवीत विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वैष्णवांचा मेळा निघतो. हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.
आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचा लोकोत्सव आणि पालखी सोहळा हे महाराष्ट्राचे वैभव! तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.
महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यांतूनही लोक वारीमध्ये सहभागी होतात. आतातर परदेशातून लोक खास वारी अनुभवण्यासाठी महाराष्ट्रात येतात. दिवसेंदिवस वारीतील वारकर्यांची संख्या वाढत चालली आहे.
१९६५ च्या सुमारास आळंदीच्या पालखीमध्ये पाच हजार लोक सहभागी झाल्याचा उल्लेख दि. ब. मोकाशी यांच्या पुस्तकात आढळतो. आज ती संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे. वृद्धांप्रमाणे तरुणही आता वारीत सहभागी होत आहेत. कोणतीही जाहिरात न करता, मार्केटिंग न करता लाखो भाविक वारीत सहभागी होतात.
वारी म्हणजे नियोजनाचे सर्वोत्तम उदाहरण! मार्च महिन्यातच दिंडीचे नियोजन होते. दिंडीतील सहभागी वारकरी, आचारी, शिधा, मुक्कामाची सोय सर्व नियोजन होते. वारीतील शिस्त तर काय वर्णावी! कोठेही गडबड, गोंधळ नसतो. स्वयंशिस्तीने चालणार्या वारकर्याला आस असते ती फक्त विठुरायाच्या भेटीची! लाखो वारकरी असूनही त्यांच्यातील शिस्त कधी बिघडत नाही. त्यांची शिस्त समाजाला दिशा देणारीच असते.