अमरावती : (Bacchu Kadu On Ravi Rana) शिंदे-फडणवीस सरकार समर्थक दोन अपक्ष आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते. बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणी आणि अचलपूरचे आमदार बच्चु कडू यांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शिंदे-फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली.
दरम्यान, आज बच्चू कडू यांनी मेळावा घेवून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले सत्ता गेली चुलीत. मी कधीच राजकारणासाठी दिव्यांगांचा वापर केला नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, आमच्या वाटेला आलेल्यांचा कोथळा बाहेर काढतो. ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो. पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही असा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना दिला आहे.
रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वाकयुद्धानंतर बच्चू कडू यांनी आज अमरावतीत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या मेळाव्याला बच्चू कडू यांनी संबोधित करताना राणा यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकत असल्याचे संकेत दिले. ते शायरीतून म्हणाले, ‘जली को आग कहते है, बुझी को राख कहते है’ म्हणत विरोधकांना आव्हान देत बच्चू कडू यांनी मेळाव्यात जोरदार हल्ले चढवले. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नसून लढवय्यांचा पक्ष आहे. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही जर कोणी वार केला तर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.