”आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत हे विसरून चालणार नाही”, काँग्रेस नेत्याचा सरकारला इशारा

मुंबई : (Balasaheb Thorat On Shinde-Fadvavis Government) केंद्र सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी तोंडाला काळ्यापट्ट्या लावून आज विधान भवन परिसरात आंदोलन केलं. विरोधकांची मुस्कटदाबी होतेय, देशात हुकूमशाही असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. विशेष म्हणजे विधानसभेतही आज विरोधकांनी सभात्याग केला आहे. सभात्याग केल्यानंतर विरोधकांनी विधान भवन परिसरातून संयुक्त पत्रकार परिषद घेतली असून, सरकारला खडे बोल सुनावलेत.

आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधींची अवहेलना करणारी घोषणा आणि कृती चालली होती. ती अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारची आहे. आज आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत हे विसरून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करता अध्यक्षांनी कडक अशी कारवाई करावी, असा आग्रह आम्ही धरलेला होता, असंही काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणालेत.

ही जी नवी पद्धत पडते आहे, हे कुठे तरी बंद केलं पाहिजे. हे कृत्य ज्यांनी केलं, त्यांना शिक्षा केली पाहिजे, असा आग्रह आम्ही धरलेला होता. ही जबाबदारी अध्यक्षांची आहे, त्यांनी निरपेक्ष राहिले पाहिजे आणि निरपेक्ष राहून निर्णय दिले पाहिजेत. आपल्या प्रांगणात काही चुकीचं घडत असल्यास त्याची जबाबदारी अध्यक्षांची असते. परंतु अध्यक्ष टाळाटाळ करीत असल्याचं आम्हाला दिसतंय. मराठवाडा मुक्ति संग्रामासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलवावं, ही सुचना सरकारनं मान्य करायला हवी. सरकारची नकारात्मक भूमिका ही आपल्या परंपरेला साजेशी नाही. म्हणून आम्ही सभात्याग केलेला असल्याचंही बाळासाहेब थोरातांनी सांगितलंय.

Prakash Harale: