प्रसिद्ध कन्नड लेखक पद्मश्री डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी ‘महाभारत’ या ग्रंथावर लिहिलेल्या ‘पर्व’ या कादंबरीवर आधारित महानाट्याचे पुण्यात सादरीकरण होणार आहे. तब्बल आठ तास चालणार्या या कानडी भाषेतील महानाट्याचे आयोजन कन्नड संघ, पुणे आणि म्हैसूर येथील रंगायना संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. रविवार, दि. ३ जुलै रोजी एरंडवणे येथील कलमाडी हायस्कूलमधील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह येथे या महानाट्याचा प्रयोग होणार आहे.
पुणे ः आपल्या वेगळ्या लेखनशैलीने वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या पर्व या कादंबरीवर आधारित महानाटकाच्या प्रयोगास प्रवेश विनामूल्य असून, प्रवेश प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्त्वावर दिला जाईल, तसेच काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील, याची कृपया नोंद घ्यावी. नाटक सकाळी १०:३० ला सुरू होऊन सायंकाळी ६:३० ला संपेल. मानाचा सरस्वती सम्मान प्राप्त डॉ. भैरप्पा यांनी १९७९ मध्ये लिहिलेल्या ‘पर्व’ या कादंबरीत महाभारताची कथा ही एकपात्री प्रयोग या साहित्यिक तंत्राद्वारे मांडण्यात आली आहे. इतिहास आणि पौराणिक कथांचे मिश्रण या कादंबरीत पाहायला मिळते. महाभारतातील कुंती, द्रौपदी, भीम, अर्जुन, कर्ण, विदूर अशा विविध पात्रांचा त्यामध्ये समावेश आहे. या पात्रांमधील स्वकियांची भूक, सूड घेण्याची इच्छा, वंचिततेची भावना आणि लोक आणि समुदाय यांच्यापासून दुरावल्याची भावना या नाटकातून मांडण्यात आली आहे.
यातील प्रत्येक व्यक्तिरेखा एक सामान्य माणूस म्हणून आपल्यासमोर येते. या कादंबरीचे मराठीसह २० हून अधिक भारतीय भाषांमध्ये तसेच मॅनडेरीन आणि रशियन या परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहे. पर्व या महानाट्याची निर्मिती रंगायना म्हैसूर या निर्मिती संस्थेचे प्रमुख अदांडा करिअप्पा यांनी केली असून, दिग्दर्शन प्रकाश बेलावडी यांनी केले आहे. नाटकात ३५ प्रमुख पात्रांमध्ये दुर्योधन (नंदकुमार), भीम (राजेश माधव), द्रौपदी ( कुमारी सौम्या), संजय (राजशेखर) आणि कुंती (अक्षता) यांचा समावेश आहे. कलाकारांची वेशभूषा प्रसाद बिडप्पा यांनी केली आहे. नाटकाचे संगीत रवि मारूर यांनी दिले असून, प्रकाशयोजना महेश यांनी केली आहे.