मुंबई | Bhaskar Jadhav – तीन महिन्यांपासून तुरूंगात असेलेल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून सगळीकडे जल्लोष साजरा केला जात आहे. तसंच राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांना सावध राहण्याचा इशारा देखील दिला आहे.
“आम्ही आज सगळेच आनंद अश्रूंमध्ये न्हाऊन निघतोय कारण, संजय राऊत हे आमचे नेते आहेत. एक लढवय्ये नेते आहेत, तत्वनिष्ठ नेते आहेत. आपल्या भूमिकेशी ठाम राहणारे नेते आहेत. हे नेते मागील चार-दोन वर्षे या देशात जो लोकशाहीवर घाला घातला जात होता. या लोकशाहीचं अधंपतन केलं जात होतं. या लोकशाहीच्या नावानं, सत्तेचा दुरुपयोग करून संपूर्ण देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू होतं, त्याविरोधात ते आपल्या लेखणीनं प्रहार करत होते. त्यांना विविध प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते काही थांबवू शकले नाहीत आणि मग शेवटचा उपाय म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. तुरुंगात टाकत असताना अतिशय खोट्या केसेस तयार केल्या, खोटे पुरावे तयार केले आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. परंतु जेलमध्ये गेल्यानंतरही संजय राऊत हे दमले नाहीत, थकले नाहीत. कोणत्याही प्रकारे त्यांनी शरणागती पत्कारली नाही. किंबहूना ते अधिक ताकदीने उभे राहिले, हिंमतीने उभे राहिले”, असं भास्कर जाधव म्हणाले.
“संजय राऊत म्हणाले होते की, मी झुकणार नाही. ते त्यांनी खरं करून दाखवलं. ते झुकले तर नाहीतच परंतु अन्यायाच्या विरोधात या देशातील जनतेनं कसं लढावं याचं एक उत्तम उदाहरण राऊतांनी आपल्या कृतीनं तरूणांच्या समोर ठेवलं आहे. त्यांच्या घरी मी गेलो होतो, त्यांच्या मातोश्रींना, बंधूंना आणि त्यांच्या पत्नीला, मुलीलाही भेटलो. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर संजय राऊत जेलमध्ये गेले याची जराही खंत नव्हती. त्यांच्या मनात एक स्वाभीमानाची उर्मी होती. आपला मुलगा शिवसेनेसाठी, सत्यासाठी आणि शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राच्या पाठीशी उभा राहून खंबीरपणे लढतोय याचा त्यांना अभिमान होता. ज्या लोकांनी त्यांना जेलमध्ये टाकलं त्यांना मी एवढच सांगेन सावधान रहो शेर आ रहा है… माझी खात्री आहे संजय राऊत पूर्वीपेक्षा ताकदीने, उमेदीने झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोठी झेप घेतील, असं मला वाटतं”, असं म्हणत भास्कर जाधव यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.