“जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे…”, दीपाली सय्यद यांची मिश्कील टिपण्णी

मुंबई | Deepali Sayed – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात मनसे कार्यकर्त्यांना आंदोलनाचे आदेश दिले. त्यानंतर मनसे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलनं करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी तोडफोडीही केल्याचं दिसलं. यावरून आता शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी मनसे (MNS) कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरे हे शिर्डीहून मुंबईला जात असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली होती. त्यावेळी अमित ठाकरेंसोबत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वाद घातल्याचं म्हटलं जातंय. या वादानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्या टोलनाक्याची तोडफोड केली होती. यावरूनच आता दीपाली सय्यद यांनी ट्विट करत मनसे कार्यकर्त्यांवर टीका केली आहे.

दीपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी. राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत! दोन दिवसाचे काम, उगाच जेलमध्ये महिनाभर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पन! युवा नेत्यांना घराबाहेर काढुन कामाला लावा, असं म्हणत दीपाली सय्यद यांनी अमित ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

admin: