मुंबई : सध्या राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे दरांवर परिणाम झाला आहे.
सध्या टोमॅटोच्या भावात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली असून याचा फायदा राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.
वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोचा दर ३५ ते ४० रुपये किलो झाला आहे, तर किरकोळ बाजारात हाच दर ६० ते ७० रुपये किलो झाला आहे.दरम्यान, तीन-चार दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये किलो असलेला टोमॅटोचा भाव आज किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका सहन करावा लागत आहे.पावसामुळे टोमॅटोची आवक घटल्याने टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आयात केली जाते, मात्र पावसाने दडी मारल्याने त्याची आवक कमी झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाची आवक पाहता हे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील अवकाळी पावसाचा सर्वच शेती पिकांवर परिणाम होत आहे. या पावसामुळे शेती मालाच्या उत्पादनातही घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका इतर पिकांसह टोमॅटो पिकालाही बसला आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे.
५० टक्के उत्पादन घटले..
एपीएमसी घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस सुरु असल्यामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे टोमॅटोचे ५० टक्के उत्पादन घटले आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. गेल्या आठवड्यात ३० ते ३२ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेले टोमॅटो आता ३५ ते ४५ रुपयांवर विकले जात आहेत. सततच्या पावसामुळे आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत.