नवी दिल्ली : भारत १०० व्या स्वातंत्र्यदिनी एक विकसित आणि प्रगत राष्ट्र असेल. देशात भ्रष्टाचार, जातीवाद, जमातवाद याला कोणतीही जागा नसेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारतात ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये जी-२० ची शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी याविषयी भाष्य केलं. जग भारताला मार्गदर्शकाच्या रुपात पाहात आहे. आपले शब्द आणि ध्येय जगाकडून भविष्यातील दिशादर्शकाच्या स्वरुपात पाहिले जात आहेत. आता या केवळ कल्पना राहिलेल्या नाहीत. जगाला आपल्याकडून आशा आहेत, असं मोदी म्हणाले.
जगाचा जीडीपी केंद्रीत दृष्टीकोण आता मनुष्य केंद्रीत होत आहे. भारत देश यामध्ये महत्त्वाचीआणि मध्यस्त म्हणून भूमिका पार पाडत आहे. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला असल्याचं मोदी म्हणाले. खूप काळ भारताकडे एक अब्ज उपाशी पोटांचा देश म्हणून पाहिलं जात होतं. पण, आता एक अब्ज महत्वाकांक्षी बुद्धीवानांचा आणि दोन अब्ज कौशल्यपूर्ण हातांचा देश म्हणून पाहिलं जात आहे, असे ते म्हणाले.