पुणे : आज (सोमवार) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना टीका केली आहे. शांत महाराष्ट्राला अशांत करण्याची ही विकृत मनोवृत्ती असल्याचं म्हणत त्यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला आहे.
यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या, “करोना महामारीमधून महाराष्ट्र बाहेर पडत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न असे मोठे प्रश्न राज्यासमोर आहेत. यासाठी हा महाराष्ट्र एकत्र येतो, लढतो आणि या लढाईच्या विरोधात जिंकतो देखील. महाराष्ट्राला सावरण्यासाठी विरोधकांनी भूमिका घेतली पाहिजे. या महाराष्ट्रात वाद कसा निर्माण होईल, याकडे काहींचं फार लक्ष असतं. त्या लोकांचे कोणते व्हिडिओ, कोणते फोटो आहेत हे मला माझ्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचं वाटत नाही.”
“नवनीत राणा या केंद्रात प्रतिनिधित्व करतात, त्यांनी जर कोरोना काळात महाराष्ट्र राज्य अडचणीमध्ये होता तेव्हा असाच पुढाकार घेऊन केंद्राकडे मदतीसाठी मागणी केली असती, तर ती मागणी महाराष्ट्राच्या लोकांच्या निश्चित लक्षात राहिली असती. पण सध्या जे काही चाललं आहे ते शांत महाराष्ट्राला अशांत करायचं ही विकृत मनोवृत्ती वाटत आहे.” असं म्हणत त्यांनी नवनीत राणा यांना टोला लगावला आहे.