मुंबई | Jayant Patil On BJP – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. सत्तेविना भाजप राहू शकत नाही, म्हणून त्यांनी पडेल ती किंमत देऊन शिवसेना (Shivsena) फोडली असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. मात्र कोणावर तरी खापर फोडायचं म्हणून राष्ट्रवादीचं नाव घेतलं जातं आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भाजपचं आहे. हिंदुत्वाची मतं जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही यातूनच भाजपनं पक्ष फोडल्याचं जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसनं महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठी चांगली साथ दिली. पवारसाहेबांनीच पुढाकार घेऊन या महाविकास आघाडीची स्थापना केली होती. त्यामुळं या विरोधी काही करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, शिवसेना फोडल्याचं खापर कोणावर तरी फोडायचं म्हणून भाजपकडून राष्ट्रवादीचं नाव घेतलं जात आहे. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या आमदारांशी आमचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे, ती कोणाच्या घरी आहे हे थोड्या दिवसांनी कळेल, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
पुढे जयंत पाटील म्हणाले, शिवसेनेची बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती, ती भाजपप्रणित होती. शिवसेना फोडण्यात भाजपचा हात असल्याचं यातून स्पष्ट होतं. ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम, दाम, दंड, भेद वापरून फोडणे योग्य आहे का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जन मताची छोटीशी चाचणी होणार आहे. उमेदवार पळवायचे काम हे करत असतील तर जनता हे पाहत असल्याचं पाटील म्हणाले.