मुंबई | Jayant Patil – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत चांगलीच फुट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीविरूद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा सामना रंगताना दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीये. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले, त्यांनी काही ना काही उद्देश व लाभ ठरवून गेले आहेत, हे जनतेच्या लक्षात आलं आहे. तसंच काही आमदारांना पश्चाताप होत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळं पुढच्या काळात चित्र वेगळं असेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची पावसामुळं झालेली प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारनं जनतेच्या मदतीला यायला पाहिजे होतं. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचं दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नामोहरम करणं आणि त्यांना अडचणीत आणणं असा उद्योग काही लोक करत आहेत. परंतु, त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाल बळी पडू शकत नाहीत, असंही पाटील म्हणाले.