मुंबई | Kishori Pednekar On Nitesh Rane – माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे. आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार आहेत. त्यामुळे आत्ताच त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे. तसंच मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून भ्रष्टाचाराचा उल्लेख करणाऱ्या नितेश राणेंवर प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका केली आहे.
यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “नितेश राणे रात्री पत्र लिहितात का माहिती नाही. भ्रष्ट म्हणणाऱ्या सर्वांना तुम्ही मांडीवर घेतलं आहे, त्यांचं आधी काय करणार ते सांगा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवलं असतानाही तेच मुंबई महापालिका जिंकतील. कारण तुम्ही अनेक पक्ष फिरुन येणार, नंतर आता ज्या पक्षात आहात त्यांच्यासाठी गळे काढत आहात. त्यांच्याकडे इतकं लक्ष देण्याची गरज नाही. नितेश राणे आपल्या वडिलांचं ऐकत नाही, दुसऱ्यांचं काय ऐकणार?”
“ठाकरे कुटुंबाला टार्गेट करण्यामागे वेगळे हात, दिल्लीमधील टाळकी सगळं काही आहे. आम्ही नियतीवरही विश्वास ठेवणारे आहोत. हा संत भूमींचा महाराष्ट्र आहे. त्यांना महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळवायचा होता, डोकी फोडायची होती ते आदित्य आणि उद्धव ठाकरे होऊ देणार नाही. त्यामुळेच आदित्य ठाकरेंना नामोहरम करणं हा एकमेव अजेंडा आहे,” असा आरोप देखील किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.