कोलकत्ता : पश्चिमं बंगालमध्ये १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारानंतर तिचा मृत्यू झाला आहे. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी मुलीचं प्रेमप्रकरण होतं असा युक्तिवाद केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांनी टीकाकारांना उत्तर देताना शवविच्छेदन होण्याआधीच पीडितेवर अंत्यसंस्कार का करण्यात आले ? तसंच पाच दिवसांनी तक्रार का दाखल करण्यात आली? अशी विचारणा केली आहे.
पीडित तरुणी एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. यावेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या २० वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
यासंदर्भात ममता बॅनर्जी म्हणाल्या, “जर मुलगा आणि मुलगी प्रेमात असतील तर त्यांना थांबवणं माझं काम नाही. हा उत्तर प्रदेश नाही जिथे लव्ह जिहादविरोधात जातात. इथे कुणालाही प्रेम करण्याचं स्वातंत्र्य आहे”. जर गुन्हा झाला असेल तर कारवाई होईल आणि याप्रकरणी कारवाई झाली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे की, “तुम्हीच सांगा जर एखाद्याचा मृत्यू ५ तारखेला झाला असेल आणि त्यात काही शंका, तक्रारी असतील तर मग त्याच दिवशी तक्रार दाखल का नाही झाली? तुम्ही पुढे जाऊन मृतदेहावर अंत्यस्कार केले? मी इथे एक सामान्य व्यक्ती म्हणून बोलत आहे, ज्याला काहीच माहिती नाही. पोलिसांना पुरावा कसा मिळणार? तिथे बलात्कार झाला, गर्भवती होती की अजून काही कारण होतं,” अशी विचारणा ममता बॅनर्जींनी केली आहे.