संवाद : अनेक सोसायटीधारकांच्या समस्या प्रलंबित
पिंपरी : भारतीय जनता पक्षाची महापालिकेत पाच वर्षे सत्ता होती. मात्र, या सत्ता काळात भाजपने शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे सोसायटीधारकांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते पवार यांनी थेरगाव येथे सोसायटीधारकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, यावेळी पवार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, मयूर कलाटे, श्याम लांडे, विनोद नढे, नाना काटे, शहर प्रवक्ते विनायक रणसुभे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका माया बारणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, सतीश दरेकर, संजय वाबळे, राजेंद्र साळुंखे, राजेंद्र जगताप, स्वाती काटे, कैलास बारणे, वर्षा जगताप, अतुल शितोळे, दीपक साकोरे, प्रकाश सोमवंशी आदी उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे वाढती महागाई, बेरोजगारीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. महागाईने जनता होरपळत आहे. आता वर्षाला 15 घरगुती गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. पण, त्याच्या अटी, शर्ती अतिशय जाचक आहेत. 15 सिलिंडर मिळणे मुश्कील होणार आहे, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक माजी नगरसेविका माया बारणे यांनी केले. अजित पवार म्हणाले, शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न केले आहे. भामा-आसखेड धरणाचे पाणी शहराला मिळणार आहे. शहराला 24 तास पाणी कसे मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद मिटतील का ? असे विचारले असता पवार म्हणाले, दोघांतील वाद पराकोटीला गेले आहेत. शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्र मार्गी लावण्यासाठी शहर राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे. या सोसायटीधारकांशी संवाद कार्यक्रमाला पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल यांनी कार्यक्रमात उपस्थिती लावत शहर राष्ट्रवादीमध्ये एकजुट असल्याचे दाखवून दिले. त्यात पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्न असून, शब्दाने शब्द वाढत जातो. जसे दिवस पुढे जातील तशी कटुता कमी होईल. आता मुंबईतील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष राहील. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणूक निकालावर लक्ष असेल. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार की गोठवणार ? गोठवले तर दोघे दुसरे कोणते चिन्ह घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.