“उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय परिपक्वता दिसत नाही…”,नवनीत राणांची टीका

मुंबई | Navneet Rana On Uddhav Thackeray – ठाकरे सरकारच्या काळात राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्याचाही संदर्भ दिला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी जमणार, यावरून राजकीय दावे-प्रतिदावे सुरू असताना त्यावरून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “मला वाटतं की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हाच जर एवढा संघर्ष आणि प्रयत्न केले असते तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद त्यांना मिळाली असती. पण आज जेव्हा सगळं विस्कटलं आहे, तेव्हा हे सगळं सुरू आहे”, असं नवनीत राणा म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, “एकनाथ शिंदेंबरोबर बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. महाराष्ट्रातले बाळासाहेब ठाकरेंना मानणारे लोक शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहतील. जबरदस्तीने ज्यांना आणलं आहे, ते उद्धव ठाकरेंच्या सभेत असतील. कारण महाराष्ट्र विचारांवर चालणारा आहे, जबरदस्तीने चालणारा नाही”.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाचा नवनीत राणांनी संदर्भ दिला. “उद्धव ठाकेरंचं भाषण मी त्या दिवशी ऐकलं. ते म्हणाले की, ‘आजपर्यंत मुलं चोरून नेल्याचं आपण ऐकलं होतं, पण बाप चोरून नेल्याचं कुणी ऐकलं नाही’. पण बाप चोरून कुणी नेत नाहीये. तुम्ही जी विचारधारा बाजूला सारली होती, ती विचारधारा आणि बापाला हातात घेऊन विचारधारा जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी केलं. हे उद्धव ठाकरेंनी मान्य करायला हवं. ते जे बोलतायत, त्यावरून मला वाटतं की राजकीय परिपक्वता उद्धव ठाकरेंमध्ये दिसत नाहीये”, अशी टीका नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Sumitra nalawade: