मुंबई | New Guidelines For Cab Drivers – टाटा सन्सचे सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं 4 सप्टेंबर रोजी अपघाती निधन झालं. तेव्हापासून केंद्र सरकारनं चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट लावण्याबाबतचे नियम कडक केले आहेत. या संदर्भात उबर (UBER) कंपनीने देखील त्यांच्या सर्व चालकांना निर्देश दिले आहेत. तसंच उबरची प्रतिस्पर्धक कंपनी OLA ने देखील आपल्या कार चालकांना संबंधित नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काय आहेत नियम? जाणून घ्या
सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या वेळी ते मर्सिडीज-बेंझ जीएलसी कारच्या मागील सीटवर बसले होते, जी अत्यंत सुरक्षित कार होती. मात्र त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता आणि हे कारण त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर कॅब कंपनीकडून कारचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांच्या कारमध्ये योग्य मागचा सीट बेल्ट असणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा दंड टाळण्यासाठी प्रवाशांना कारच्या मागील सीट बेल्टचा वापर करता येईल. त्याचबरोबर, चालक स्वतः सीट बेल्टचे नियम पाळत आहेत की नाही? याबाबत कंपनी स्वतः तपासणी करत आहे.
दरम्यान, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली होती की, रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले होतं की, सायरस यांच्या अपघातामुळे सरकारने मागे बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट अलर्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागे बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट घातला नसेल तर अलर्ट वाजला जाईल. ड्रायव्हर आणि समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावला नाही तर त्यासाठी दंडाची तरतूद आहे. मात्र मागे बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न लावल्याबद्दल दंडही भरावा लागणार आहे. हे सर्व कारसाठी लागू होईल. त्यामुळे आता खासगी आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे, या नियमानुसार मागे बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट वापरणे आवश्यक आहे.