मुंबई | Nitesh Rane On Uddhav Thackeray – भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सत्तेची लालसा, अधिक मतांची लालसा जीवघेणी ठरत आहे. मुंबईबाहेरील लोकांनाच मतांच्या लोभात अनधिकृत बांधकामांना तुमचे नगरसेवक परवानगी देतात. मुंबईत १४ फुटाच्यावर वाढीव बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहर नजर असल्यानं ही बांधकामं रोज सुरू आहेत. आनधिकृत बांधकामं वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहचली आहेत. त्यामुळं जीवाशी खेळ करत तिथं दोन दोन मजली झोपडपट्ट्या उभारल्या आहेत, आसा आरोप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर केला आहे.
नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, वारंवार अनधिकृत बांधकामं ढासळत आहेत. यामध्ये लोकांचा जीव, बळी जातोय. आपण मात्र शांततेत हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्यानं पाहत आहात. यामुळं निर्माण होणारी तुमची असंवेदनशील मुख्यमंत्र्याची प्रतिमा सामान्यांना हवालदिल करणारी आहे. सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मनमर्जीनं राज्य चालतं. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कोणीही अस्वस्थ होऊ शकतो. गुन्हेगारीचं साम्राज्य, भ्रष्टाचाराची दलाल वाढत वाढत सामान्य मुंबईकरांच्या उंबऱ्यापर्यंत पोहलीयं. तुम्ही देखील मुंबईचे रहिवाशी असल्याने ढिसाळ कारभाराची राड तुमचा उंबरा एकनाएक दिवस ओलांडणारच होती, झालं ही तसंच.
तसंच गुरूवारी ९ जूनला तुमच्या निवासस्थानाहून तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेलं वांद्रे पश्चिमधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशीर बांधकाम कोसळलं. १७ जण जीवन मरणाशी लढा देत आहेत. ४० वर्षीय युवकाचा बळी गेला. त्या कुटुंबांनी फोडलेल्या टाहोने मुंबईच्या काळजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथे भेट देऊन विचारपुस करण्याची तसदीही घेतली नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की त्या निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगलेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.