‘पीएमपीएमएल’च्या उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत पीएमपीएमएल बसची संख्या कमी पडत आहे
अपुर्या बस, ब्रेकडाउनचे वाढते प्रमाण
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी असलेल्या ‘पीएमपीएमएल’ची बससेवा सोलापूर, कोल्हापूर असा विस्तार करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करीत जिल्ह्याबाहेर विस्तारीकरणाला आमचा विरोध आहे, अशी भूमिका भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी घेतली आहे.
पिंपरी : याबाबत पीएमपीएमलचे लक्ष्मीनारायण मिश्रा यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सक्षम करण्यासाठी दोन्ही महापालिकांनी एकत्रितपणे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) स्थापन केले आहे. वास्तविक, दोन्ही शहरे आणि सभोवतालच्या परिसरात वाढत्या लोकसंख्येचा विचार केला असता, बस सुविधा आणखी सक्षम करण्याची मोठी आवश्यकता आहे. अपुर्या बस, ब्रेकडाउनचे वाढते प्रमाण, नियोजनातील विस्कळीतपणा यामुळे अगोदरच पीएमपीएमएलच्या कारभारावर नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
पीएमपीएमएलमधील खासगी बस ठेकेदारांनी संप केल्यामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली होती, ही बाब डोळ्यांसमोर असतानाही प्रशासन आता पीएमपीएमएलचा सोलापूर, कोल्हापूर असा विस्तार करण्याच्या हालचाली करीत आहे, असे समजले. वास्तविक, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत पीएमपी बसची संख्या कमी पडत आहे. पीएमपीकडे दररोज २५० ते ३०० बसेस अतिरिक्त ठरत असून, त्या भाडेकराराने इतर महापालिकांना देण्यासाठी पीएमपीने महापालिकांना पत्र पाठवले आहे. उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यापैकीच हा एक प्रकार आहे, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे. मात्र, पीएमपीला दोन्ही महापालिका संचलन तूट देत असते. प्रत्यक्षात पीएमपी आर्थिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी खर्च कमी करीत डिझेलवरील बस बंद केल्या आहेत. तर, ई-बस वाढवल्या आहेत. असे असताना पुन्हा केवळ उत्पन्नवाढीसाठी नवीन उपाययोजना करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सेवेवर ताण येईल, असे धोरण योग्य नाही.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विस्तार करावा…
-वास्तविक, पीएमपी ही दोन्ही शहरांसाठी देण्यास स्थापन केली आहे. मात्र, एसटीच्या संपामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पीएमपीच्या फेर्या जिल्ह्यात वाढवल्या होत्या. आता एसटीचा संप जवळपास मिटल्याने या बसेसची सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याबाबत निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मग पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील बसफेर्या वाढवून उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने विचार केला पाहिजे. अतिरिक्त बस झाल्या असतील, नवीन बसमार्ग निर्माण केले पाहिजेत. ज्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना सक्षम प्रवासी सुविधा उपलब्ध होईल, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.