मुंबई | Parivartan Kranti By Sambhaji Raje Chatrapati – माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. हे ट्विट करत संभाजीराजेंनी समर्थकांना येत्या 9 ऑगस्ट रोजी तुळजापूरात जमा होण्याचं आवाहन केलं आहे. तसंच क्रांतीदिनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात होणार आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. “क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरवात…भेटूया 9 ऑगस्ट रोजी तुळजापूरला…स्वराज्य, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात तुळजापूरमधून करण्याला कारण आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आलं होतं. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत आहेत. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी क्रांती दिनी तुळजापूर इथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचं ट्विट केल्याने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं पाठिंबा न दिल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर 12 मे रोजी स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती. याच संघटनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र दौरा केला होता.