“संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी वाऱ्यावर सोडले आहे”

पंढरपूर | Pravin Darekar On Uddhav Thackeray – भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना अथवा उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या अटकेत असलेले संजय राऊत यांना वाऱ्यावर सोडलं असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय राऊत यांच्याबाबत काळजी व्यक्त करणारं एकही वक्तव्य करण्यात आलं नाही. संजय राऊत हे शिवसेनेचे नेतेच नव्हे इतका विसर उद्धव ठाकरे यांना पडला असल्याचा टोला दरेकर यांनी लगावला आहे.

प्रवीण दरेकर हे सध्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांना वाऱ्यावर सोडलं असल्यासारखी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून वर्तवणूक सुरू असल्याचं दरेकर यांनी सांगितलं. संभाजी ब्रिगेड सोबत शिवसेनेच्या आघाडीवर टीका करताना त्यांनी म्हटलं की, आता उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच राहिले नसून बुडत्याला काडीचा आधार लागतो. त्याप्रमाणे मिळेल तो आधार घेण्याचा ठाकरे यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. ज्यांनी सावरकरांवर टीका केली, ज्यांनी हिंदुत्वावर टीका केली, ज्यांनी छत्रपतींच्या आणि इतर संदर्भात वादग्रस्त भूमिका घेतल्या, त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका शिवसेनेने घेतली. यावरून उद्धव ठाकरे यांना अजूनही काहीच समजत नाही हे दुर्दैव असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी रोहित पवार यांच्या ईडी चौकशीसंदर्भात देखील भाष्य केलं. सध्या रोहित पवार यांची चौकशी सुरु असली तरी हे पवार हे काय कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं दरेकर यांनी सांगितलं. पवार यांना कायद्यानेदेखील अपवाद दिला नाही. त्यामुळे त्यांचीदेखील इतरांप्रमाणे चौकशी होणार असल्याचा टोला दरेकर यांनी लगावला. ज्यांच्या चौकशीत काही आढळत नाही, त्यांना तपास यंत्रणा सोडून देते असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Sumitra nalawade: