लखनऊ : कोळशानं भरलेली मालगाडी कानपूरहून गाझियाबादच्या दिशेनं कोळसा घेऊन जात होती. या मालगाडीचे सुमारे १२ डबे इटावा जिल्ह्यातील फ्रेट कॉरिडॉरवर रुळावरून घसरले असून हे डबे कोळशानं भरलेले होते. सुमारे डझनभर डबे उलटल्यानंतर कोळसा सर्वत्र पसरला होता. यामुळं महाराष्ट्रात कोळशाची टंचाई असताना उत्तर प्रदेशात मात्र कोळशाची नासाडी होताना पाहायला मिळत आहे. यात रेल्वे ट्रॅकचं ही मोठं नुकसान झालं आहे. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांसह पोलिस प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान, या अपघातात रेल्वे ट्रॅकच्या बाजुचे दोन खांबही तुटून पडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, कोळशाचे डबे मधूनच तुटले आहेत. घटनास्थळी पोहोचलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ग्रामीण सत्यपाल सिंह यांनी सांगितलं की, सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या रेल्वेचे डबे हटवण्याचे काम सुरु झाले आहे. या अपघाताची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.