मुंबई : (Raju Shetty On Shinde- Fadnavis Government) राज्यात दुसऱ्यांदा अवकाळी पाऊसासह (Unseasonal Rain) आणि गारपीटमुळे राज्यातील शेतकरी माडून पडला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सरकारला खडे बोल सुनावलं आहे. एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ झाल्याचे शेट्टी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात बेमोसमी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात कांदा, पालेभाज्या, फळबागांसह, ज्वारी, बाजरी, गहु, मका, ऊस यांसारखे पिके जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.
तळहातावरच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपलं पीक जपत असतो, पण निसर्गाच्या फटक्याने होत्याचं नव्हतं होते. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे. मुख्यमंत्रीसाहेब प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यायचं असेल, तर खुशाल घ्या. ती तुमची व्यक्तिगत बाब आहे. मात्र, राज्य प्रमुखाला व्यक्तिगत बाबींपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात आणि कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं असं शेट्टी म्हणाले.
त्यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका. ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला गेला आहात त्या प्रभू रामचंद्रानं प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं म्हणून आज जनता म्हणते रामाचं राज्य आलं पाहिजे. आणि तुमच्या राज्यात रामाचं राज्य निर्माण करायचं असेल, तर अडचणीत आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या, एवढीच कळकळीची विनंती आहे.