मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तसंच एकनाथ शिंदे बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे 15 ते 35 आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान सर्वपक्षीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही यावर भाष्य केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही, असं रामदास आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंड पुकारण्याची शक्यता असल्याने राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवसेना भवनाबाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शिवसैनिकांना जमण्याचे आदेश दिल्याची माहिती असून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे.