न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली, हातात तलवारीच्या जागी संविधान : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले आहेत. तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे, न्यायालयात हिंसाचाराद्वारे न्याय होत नाही. त्यामुळे त्या जागी संविधानाला स्थान देण्यात आले आहे. तर, न्याय देवतेच्या डोळ्यांवरून काळी पट्टी ही हटवण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ‘लेडी ऑफ जस्टिस’ म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा बसवला आहे. या पुतळ्याच्या डोळ्याची पट्टी काढण्यात आली आहे, जी आतापर्यंत कायदा आंधळा असल्याचे दर्शवत होते. त्याचबरोबर तिच्या हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या लायब्ररीमध्ये हा पुतळा बसवण्यात आला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या आदेशानुसार हा नवा पुतळा बसवण्यात आला आहे. वसाहतवादी वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या मते, कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे. तसेच, देवीच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान हवे. जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल. तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे, सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. न्यायालये हिंसाचाराद्वारे न्याय देत नाहीत तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात. दुसऱ्या हातातील तराजू हा प्रत्येकाला समान न्याय देत असल्याचे प्रतिक आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये मोठा पुतळा बसवण्यात आला आहे. त्या मूर्तीचे डोळे उघडे ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय, मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टीही उतरवण्यात आली आहे. मूर्तीच्या डाव्या हातात तलवारीऐवजी संविधान आहे. उजव्या हाताला पूर्वीप्रमाणेच तराजू आहे.

Rashtra Sanchar: