मुंबई : (Sachin Ahir On Eknath Shinde) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिखलीमधील सभेत केलेल्या हल्लाबोलनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली होती. या टीकेनंतर शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी पलटवार केला आहे.
कोणाचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडले आहे हे जनताच ठरवेल, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आमदार सचिन अहिर यांनी केला. अहिर यांनी कोल्हापूरमध्ये बोलतांना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणताही समन्वय नसून कोणताही मंत्री कोणत्याही खात्यावर बोलतो. उद्योगमंत्री कृषी खात्यावर बोलतात, मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत की उद्योग करणारे मंत्री आहेत?
आश्वासनांची पूर्तता करता येत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. भाजपचे 105 आमदार खासगीत सत्ता कोणासाठी आणि कशासाठी असल्याचे विचारतात. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना स्वतःचे भविष्य बघण्यात रस आहे. संपूर्ण महाराष्ट्र व जनतेचे ते काय भविष्य बघणार? असा प्रश्न अहिर यांनी उपस्थित केला. हिवाळी अधिवेशनापूर्वी वीज बिल माफीचा निर्णय घेतला नाही तर विधिमंडळाचे कामकाज पहिल्या दिवसापासून रोखून धरू असा इशाराही अहिर यांनी दिला.