मुंबई | Sambhajiraje Chatrapati On Eknath Shinde – सध्या राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच शिवसेनेनं भाजपासोबत सरकार बनवावं, मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. आज दुपारी शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार असून आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा त्यांनी केला आहे. तसंच एकीकडे राज्यात राजकीय घटनांना जोर आलेला असताना दुसरीकडे यावर संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे.
पुण्यात पालखी सोहळ्यासाठी आलेले असताना संभाजीराजे छत्रपती बोलत होते. मला उमेदवारी दिली असती तर असं घडलं नसतं, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली आहे. एकनाथ शिंदेंची खदखद आजची नाही, अनेक वर्षांची आहे. सरकार कुणाचंही असावं पण ते चांगलं चालावं एकढंच आमचं मत आहे, असं देखील संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सध्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. मात्र या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील हेही या बैठकीला गैरहजर आहेत. काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर प्रोफाईलवरुन आपल्या मंत्रिपदाचा उल्लेख हटवला होता. त्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे.