मुंबई : (Sanjay Raut On Devendra Fadnavis) महाविकास आघाडी शेवटचे घडके मोजत असताना ठाकरे सरकारनं आणि खासकरुन उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला-संभाजीनगर, उस्मानाबादला-धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला-दी बा पाटील यांचं नामंतराचे विषय कॅबिनेटमध्ये मंजूर करुन घेतले. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी स्थगिती दिली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारनं दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत. त्यानंतर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे अशी नागपूर दौऱ्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
नामांतर रद्द करुन सरकारनं काय साध्य केलं हे फडणवीसांना विचारलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही, त्यामुळं त्यांना विचारणार नाही. एकीकडं शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणून आक्रोश करत आहात, आणि दुसऱ्या बाजूला औरंगाबाद, उस्मानाबादसंबंधी निर्णयाला स्थगिती का देत आहात? राजकीय, आर्थिक, बुलेट ट्रेनसंबंधी निर्णय समजू शकतो. आरेचा विषय तुमचा जिव्हाळ्याचा होता हे समजू शकतो. त्यासाठी आम्ही संघर्ष करु. पण औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.