सरकारचं ‘डेथ वॉरंट’ निघालं, पंधरा दिवसात सरकार कोसळणारच; संजय राऊत

जळगाव : (Sanjay Raut On Maharashtra Government) जिल्ह्यातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचे दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी त्यांची जाहीर सभा देखील आयोजित केली आहे. त्यामुळे जळगावच्या पाच बंडखोर आमदारांवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ धडाडणार आहे.

दरम्यान, या सभेवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर याचवेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. आगामी 15 दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर या सरकारचं ‘डेथ वॉरंट’ निघाले असल्याचं राऊत म्हणाले आहे. राऊत यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजय राऊत म्हणाले की, प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले. तर मी मागे देखील एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेलं आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरलं, असल्याचं राऊत म्हणाले आहे.

Prakash Harale: