“राजकारणाचे धंदे बंद करा…”, योगी आदित्यनाथ यांच्या रोड शोवर संजय राऊतांचं टीकास्त्र

मुंबई | Sanjay Raut – सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या मुंबई दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी झालेल्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील रोड शोवर टीका केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी या होत असतात. पण ते मुंबईत रोड शो (Road Show) कशासाठी करत आहेत? इथल्या उद्योगपतींना जर ते भेटायला आले असतील. त्यांच्या राज्याच्या विकासाबाबत ते चर्चा करणार असतील, तर त्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. पण ते आमच्याकडचे उद्योग ओरबाडून नेणार असतील, तर यावर आमचा आक्षेप आहे.”

“मुंबईत योगी आदित्यनाथ गुंतवणुकीसाठी रोड शो करणार असतील, तर आश्चर्यकारक आहे. गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची गरज काय आहे? इथे आपण राजकारण करायला आला आहात की आपल्या राज्याच्या विकासासाठी मुंबईची मदत घ्यायला आला आहात? मी वाचलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला कॉन्फरन्ससाठी चाललेत. आमचे मुख्यमंत्री-उद्योगमंत्री तिथे जाऊन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी रोड शो करणार आहेत का दावोसच्या रस्त्यावर? मग ताज हाॅटेलसमोर यूपीच्या मुख्यमंत्र्यांना रोड शो करण्याची गरज काय?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय.

पुढे ते म्हणाले की, “हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण सन्मानानं आला आहात, सन्मानानं निघून जा. चर्चा करा. आम्हाला तुमच्याबद्दलचं प्रेम-आदर कायम राहील. पण इथे येऊन हे राजकीय उद्योग शक्यतो करू नका”, असंही संजय राऊत म्हणाले.

Sumitra nalawade: