मुंबई | Sanjay Raut On Central Government – महाराष्ट्रात पुराचा हाहाकार सुरू आहे, अनेक भागांत पूरस्थिती उद्धभवली आहे, पण मुख्यमंत्री मात्र दिल्लीत आहेत, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच त्यांनी केंद्र सरकरावर देखील निशाणा साधला. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यासाठीच हा अट्टाहास सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अमित शाह यांचा आमच्यावरही दबाव आहे आणि दबावाला बळी पडून ज्यांना जायचंय ते जात आहेत, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी केला आहे. ते आज (मंगळवार) माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील काही खासदारांच्या घरांवर चौकी पहारे लागलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त अचानक काही खासदारांच्या घरांवर लावण्यात आला आहे. पोलीस बळाचा, केंद्रीय यंत्रणा, पैशांचा वापर केला जातोय. ब्लॅकमेलिंगही होतंय. पण ठिक आहे, जो होगा वो देखा जायेगा. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला, सामना करायला, लढा द्यायला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर त्यांची रुटिन व्हिजिट आहे. कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं हायकमांड इथे आहे, म्हणून त्यांना दिल्लीत यावं लागतं. मंत्रिमंडळ स्थापन करायचं आहे. कारण शिवसेनेचे मुख्यमंत्री मी पाहिलेयत दोन. एक मनोहर जोशी, दुसरे नारायण राणे. पण त्यांना मी कधी दिल्लीत आल्याचं पाहिलं नाही. त्यांच्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईतच होत होत्या.”
लढाई कोणतीही असू द्यात. चिन्हाची, पक्षाची कोणतीही. मी तुम्हाला सांगतो की, कोणत्याही लढाईशी दोन हात करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. मी कालही आपल्याला सांगितलं, ज्या पद्धतीनं छुपे वार सुरु आहेत. जसं महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे भाजपचे नेतेच सांगतात. अखंड महाराष्ट्र तोडायचा, असं आम्ही नाही, तर भाजपचे नेते सांगतात. जर महाराष्ट्राचे तुकडे करायचे असतील तर आधी अखंड शिवसेना फोडा, शिवसेनेचे तुकडे करा. पण शिवसेनेच्या चिन्हावर किंवा शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आलेले आमदार आणि खासदार आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहिल. आज ज्यांच्या घराबाहेर चौकी पहारे लागले आहेत. त्यांना पुन्हा कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करु, हे मात्र मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो.”, असं देखील संजय राऊत म्हणाले.