मुंबई | Sanjay Shirsat Replied To Samana Editorial Criticism – महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आज (6 ऑगस्ट) सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडलं की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचं विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे’, असं सामनामध्ये म्हटलं आहे. त्याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “मधुचंद्र, लग्न हे शब्द ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही”, असं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
”सामना सारख्या वर्तमान पत्राचे मुख्य संपादक आता उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या तोंडी मधुचंद्र, लग्न असे शब्द शोभत नाही. आम्ही एका चांगला नेता म्हणून त्यांच्याकडे बघतो. मात्र, ते म्हणातात तसं आम्ही मधुचंद्राची एक महिन्यापूर्वी जी सुरूवात केली होती, ती यासाठी की आपलं लग्न पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. तो लग्नाचा योग आता जुळून आला आहे. लग्नापूर्वी प्रेम होत नाही, असं कधी होत नाही. ज्याचं लग्नापूर्वी प्रेम झालंय ना, त्यांच्या लग्नाचं काय होईल. यावर जास्त न बोललेलं बर असतं. त्यामुळे आमचा मधुचंद्रही झाला आहे आणि लग्नही झालं आहे. फक्त तुम्हाला बोलावण्याचा योग आला नव्हता, तोही लवकरच येईल.”, असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिलं आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणात काय घडले की, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था झाली आहे’, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती. मुख्यमंत्रीपदाची वरमाला बळंबळं गळ्यात घालून घेतली, पण मंत्रिमंडळ जन्माला येत नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असंही लेखात म्हटलं होतं.