औरंगाबाद | Sharad Pawar On BJP – भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू असून कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही असा प्रयोग राबवला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ झालेले आता कमी अस्वस्थ झाले असतील असा टोला देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मध्यावधी निवडणुका होतील असं कधीच म्हटलं नाही, मी म्हणालो की अडीच वर्षे झाली, आता अडीच वर्षे राहिली, आपण आत्तापासून निवडणुकीला तयार राहिलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले.
तसंच महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “सरकार पाडण्यासाठी काही निश्चित कारण नव्हतं. कुणी राष्ट्रवादीचं नाव घेतं, कुणी हिंदुत्वाचं कारण सांगतं, तर कुणी ईडीचे नाव घेतलं, ही सर्व कारणं सुरतला गेल्यानंतर ठरली. त्याआधी तसं काही कानावर आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी जनतेसमोर यावं आणि स्पष्ट करावं. त्यांच्याकडे काहीच सक्षम कारण नाही.”
“आमच्यात काही घडलं असतं तर तुमच्या प्रश्नाला उत्तरं दिलं असतं. राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांशी संवाद साधण्याचा माझा अधिकार आहे, त्यांनाही तो अधिकार आहे. त्यावेळी राष्ट्रवादीच्या माझ्या सहकाऱ्यांचा समावेश होता. आपली ती भूमिका नाही, भाजपसोबत जायचं नाही असं मी सांगितलं आणि ते परत आले. बाळासाहेब असताना असं काही घडल्यास वेगळी परिस्थिती असायची. उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना कार्यकर्त्यांना हिंसक होऊ नका अशी आदेशवजा सूचना केली, त्यामुळे आज शिवसैनिक शांत असतील,” असंही शरद पवार म्हणाले.