मुंबई | Shivsena – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं शिवसेनेनं त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवसेनेनं राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप (BJP) आणि शिंदे गटावरही (Shinde Group) हल्लाबोल केला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असं शिवसेनेनं (Shivsena) म्हटलं आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतलं तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्यासोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावानं वळवळू लागला आहे. त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी “शिवसेना आता काय करणार?” असं विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला.आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हातानं स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हिरो’ आहेत असं विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला आहे. हे भयंकरच आहे. महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याय राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं.
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची ‘माफीवीर’ म्हणून टवाळी केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचा भलताच इतिहास उकरून काढला व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला. वीर सावरकरांचा बचाव करताना त्यांनी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणून देशातील समस्त शिवराय भक्तांच्या अस्मितेचा पाचोळा करून टाकला असल्याचं त्यांनी म्हटलं. वीर सावरकरांच्या निमित्तानं हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत असा सवाल शिवसेनेनं केला आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी व अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी तरच त्यांचा स्वाभिमान की काय तो महाराष्ट्राला दिसेल, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
पुढे राज्यपालांवर टीका करताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, राजभवनात पाय ठेवल्यापासून भारतीय घटना व शिवरायांचे विचार अरबी समुद्रात बुडवले आहेत. शिवाजी महाराजांविषयी चुकीची विधानं करण्याचा सपटाच त्यांनी लावला आहे. ‘समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला विचारतोय कोण?’ असं एक विधान अलीकडे करून याच राज्यपाल महोदयांनी शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही महाराष्ट्रात संतापाचा स्फोट झाला होता. ‘मुंबईतून गुजराती-राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’ असं आणखी एक विधान करून मुंबईतील कष्टकरी, स्वाभिमानी मराठी माणसांचा अपमान त्यांनी केला होता. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतही राज्यपालांनी असंच घाणेरडं विधान करून गोंधळ घातला तेव्हा त्यांना माफी मागावी लागली. आता तर त्यांनी थेट शिवाजी महाराजांची चेष्टा आणि टवाळी करण्याचं धारिष्ट्य दाखवलं. महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकारला याच राज्यपालांनी सत्तेवर बसवल्यामुळेच त्यांना हे बळ आलं असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तोंडातून निषेधाचा साधा ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. शिवरायांचे विचार व मार्गदर्शन कालबाह्य झाले आहे, असं भाजपचे लोक उघडपणे बोलतात व असं बोलणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभतात हे कोणत्या जन्माचं पाप महाराष्ट्राच्या बोकांडी बसवलं आहे? अशा शब्दात शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे.
शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगारी ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचं वैयक्तिक मत आहे, असं सांगतात. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवं असं महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
View Comments (0)