‘नवनीत राणा दलित समाजातील असल्यानं त्यांच्यावर अन्याय…’- रामदास आठवले

नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा या दलित समाजातील असल्यानंच त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारकडून अन्याय होत आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. त्याचबरोबर आपला राणा दाम्पत्याला पूर्ण पाठिंबा असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

यावेळी रामदास आठवले म्हणाले, नवनीत राणा या महाराष्ट्रातील अमरावती इथल्या खासदार आहेत. त्यांनी २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २४ एप्रिल रोजी त्यांना कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

राणा यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यामुळं मी कायमच त्यांच्यासोबत आहे. राणा दाम्पत्यानं या प्रकरणाबाबत लोकसभा अध्यक्षांचीही भेट घेतली आणि याची दखल घेण्याची विनंती केली. त्याचबरोबर नवनीत राणा या आपल्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. हनुमान चालिसा पठणासाठी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासारखा काही त्यांनी मोठ गुन्हा केलेला नाही त्यामुळं त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे, असंही रामदास आठवले यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.

Sumitra nalawade: