जळगाव | Sushama Andhare On Shinde Government – सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं राज्यभर दौरा करत आहेत. मात्र, जळगावमधील त्यांच्या सभेला परवागनी नाकारतानाच त्यांना हाॅटेलमध्ये नजरकैदेत ठेवल्याचा आरोप सुषमा अंधारे आणि ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी अंधारेंनी राज्य सरकारसोबतच देवेंद्र फडणवीस, गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, “काल माझी सभा नाकारण्याचं कारण मला शेवटपर्यंत कळलं नाही. कारण माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा कुणाचा तक्रार अर्जही आलेला नव्हता. फक्त मला नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार झाला. सभेची वेळ संपेपर्यंत मी हाॅटेलमधून बाहेर पडणार नाही याची काळजी घेण्यात आली. मी कदाचित जोरजबरदस्ती करून बाहेर पडण्याचाही प्रयत्न करू शकले असते. पण त्यामुळे भाजपला किंवा गुलाबराव पाटलांना जे अपेक्षित होतं की यातून गोंधळ व्हावा, ते मला टाळायचं होतं. मला त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकायचं नव्हतं. आपण कायद्याचा आदर करणारे लोक आहोत. मी मग हाॅटेलमधूनच ऑनलाईन सभा घेतली.”
“हा सगळा प्रयत्न केविलवाणा होता. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो ही खुळी कल्पना आहे. तुम्ही अशा प्रकारे आवाज दाबून ठेवू शकत नाही”, असंही अंधारे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, “असं सगळं करून मी घाबरेन, असं काही पुढे करणार नाही असं त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. बाई समजून हलक्यात घेऊ नका. मी लढणार आहे. मी महिला म्हणून अजिबात व्हिक्टिम कार्ड खेळणार नाही. मी महाप्रबोधन यात्रा पूर्ण करून दाखवणार आहे”, असा इशाराही अंधारेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.