जीवन जगण्याची मोठी कला…!

सर्व लोकांसोबत असेच होते. आपण नेहमी आपल्या परिस्थितीशी जुळवून घेतो. पण त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत नाही. पण जेव्हा आपण पूर्णपणे परिस्थितीमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला वाटते की, मी योग्यवेळी बाहेर पडायला पाहिजे.

एका प्रोफेसरने भांड्यात पाणी टाकून त्यामध्ये बेडूक टाकला. यानंतर ते भांडे तापायला ठेवले. पाणी गरम झाल्यानंतर बेडकाचे काय झाले? प्रोफेसरने असे का केले? ते या छोट्या कथेत वाचूया…एका कॉलेजमध्ये फिलॉसॉफीचे एक प्रोफेसर होते… ते वेगवेगळ्या पद्धतींनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील लहानलहान गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करायचे…

एक दिवस त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले की, आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट समजावणार आहे. सर्व विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत व बघत होते. प्रोफेसरने पाण्याने भरलेले एक भांडे घेतले आणि त्यामध्ये बेडूक टाकला. पाण्यात जाताच बेडूक आरामात पोहू लागला. यानंतर प्रोफेसरने ते भांडे तापायला ठेवले. भांड्यातील पाणी हळूहळू गरम होत होते. भांड्यामध्ये जो बेडूक होता तो पाण्याच्या वाढत्या तापमानानुसार स्वतःला अ‍ॅडजस्ट करीत होता.

हळूूहळू पाणी जास्त गरम होत होतं, पण बेडकाला काहीच फरक पडत नव्हता. तो स्वतःला तापमानानुसार तयार करीत होता. काही वेळानंतर पाण्याचे तापमान खूप वाढले आणि पाणी उकळू लागले. तेव्हा बेडकाचीही सहनशक्ती संपली. त्याला त्या भांड्यात थांबणे कठीण झाले. तेव्हा बेडकाने उडी मारून भांड्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला. बेडकाने पूर्ण शक्ती लावूनही त्या भांड्यातून बाहेर पडता आले नाही. प्रोफेसरने तत्काळ त्या बेडकाला बाहेर काढले. प्रोफेसरने विद्यार्थ्यांना विचारले की, बेडूक भांड्याबाहेर उडी का मारू शकला नाही?

सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली. तेव्हा प्रोफेसर म्हणाले, बेडकाची इच्छा असती तर तो पाणी तापायला ठेवल्याबरोबर बाहेर येऊ शकत होता. पण बेडूक स्वतःला वातावरणानुसार अ‍ॅडजस्ट करण्याचा प्रयत्न करीत होता. जेवढे तो सहन करू शकत होता, तेवढे त्याने केले. पण जेव्हा त्याला वाटले की, जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावेच लागेल, तेव्हा तो उडी मारू शकला नाही, कारण अ‍ॅडजस्ट होण्याच्या प्रयत्नात त्याची सर्व एनर्जी नष्ट झाली होती. जर मी त्याला बाहेर काढले नसते, तर बेडूक मरून गेला असता. यालाच म्हणतात… लाइफ मॅनेजमेंट! प्रोफेसरने आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवले.

सर्व लोकांसोबत असेच होते. आपण नेहमी आपल्या परिस्थितीशी जुळवून घेतो. पण त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत नाही. पण जेव्हा आपण पूर्णपणे परिस्थितीमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला वाटते की, मी योग्य वेळी बाहेर पडायला पाहिजे होते. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. तात्पर्य काय, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला होय!

Prakash Harale: