नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय देताना विवाहाशिवाय जन्माला आलेल्या मुलांचाही वडिलांच्या संपत्तीत हक्क असल्याचं मानलं आहे. सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे की, जर स्त्री आणि पुरूष दीर्घकाळ एकत्र राहत असतील, तर ते लग्न मानले आणि या नात्यातून जन्मलेल्या मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळेल.
सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्वाळा देताना केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. केरळ उच्च न्यायालयानं एका खटल्यामध्ये तरुणाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटेकरी मानले नव्हते. कारण त्याच्या पालकांचे लग्न झाले नव्हते. दोघांचे लग्न झाले नसले तरी दोघेही पती-पत्नीसारखे दीर्घकाळ एकत्र राहत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं निर्वाळा देताना स्पष्ट केलं. अशा परिस्थितीत मूल दोघांचे असल्याचं डीएनए चाचणीत सिद्ध झाल्यास वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा पूर्ण हक्क आहे.
दरम्यान, केरळमधील एका व्यक्तीने वडिलांच्या मालमत्तेत वाटा न मिळाल्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. त्याने याचिका दाखल करताना म्हटलं होतं की, त्याला अनैतिक मुलगा सांगून वाटा वडिलांच्या संपत्तीत दिला जात नाही. केरळ उच्च न्यायालयानं निकाल देताना म्हटलं होतं की, ज्या व्यक्तीच्या मालमत्तेवर तो दावा करत आहे, त्याच्या आईने त्याच्याशी लग्न केलेले नाही, अशा परिस्थितीत त्याला कौटुंबिक मालमत्तेचा हक्क समजता येणार नाही.