महाराष्ट्रातील राजकीय गदारोळावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर राज्य तसेच देशभरातून राजकीय वर्तुळात टीका-टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेनेचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या तीस पेक्षा जास्त आमदारांना घेऊन महाराष्ट्राबाहेर गेलेले आहेत. शिवसेना पक्ष आपल्या हिंदुत्वाला विसरत चालला असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीतील सध्या सुरु असलेल्या वातावरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नवतंच” अशी थेट प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिल्लीत असताना दिली आहे.

उदयनराजे पुढे म्हणाले, राजकारणात जेव्हा दोन विरोधी विचारांचे पक्ष सत्तेसाठी एकत्र येऊन सरकार चालवतात तेव्हा ते सरकार काही काळात पडणार हे नक्की असतं त्यामुळं मला महाराष्ट्रात जे चाललं आहे त्यात मला धक्कादायक असं काही वाटत नाही. सरकार स्थापन करणाऱ्या पक्षांनी अगोदरच याचा विचार करायला पाहिजे होता असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.

Dnyaneshwar: