उध्दव ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्याची सामंतांकडून थट्टा; म्हणाले,”तिथे ते फोटोशूट करून नंतर त्याचे प्रदर्शन भरवतील आणि…”

औरंगाबाद : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी संभाजीनगरला गेलेले आहेत. तिथे उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला. यावेळी शेतकऱ्यांनी अनेक गाऱ्हाणी उद्धव ठाकरेंसमोर मांडले. ठाकरेंच्या या पाहणी दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरेंना जाग आली असल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात आहे. दरम्यान, शिंदे गटाचे उदय सामंत यांनी एक पत्रक प्रसारित करून ठाकरेंच्या दौऱ्याची थट्टाच केली आहे. उद्धव ठाकरे हे चांगले फोटोग्राफर आहेत. ते दौऱ्यावर जाऊन फक्त चांगला फोटोशूट करतील. तेथून आल्यानंतर ते एखादं फोटो प्रदर्शन भरवतील अशी टीका सामंतांनी केली आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख शेतकऱ्यांच्या बांधावर 2 तासासाठी जाणार आहेत असे समजते. सत्ता गेल्यानंतरचा शेतकऱ्यांसाठीचा हा त्यांचा पहिलाच दौरा. मातोश्रीबाहेर पडुन आपल्या लक्झरी कारमध्ये बसून नंतर प्रायव्हेट चार्टर्ड विमानाने संभाजीनगर (औरंगाबाद) पोहचतील. तिथून पुढे लक्झरी कारने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत फोटोसेशन करतील. हा Event करताना उद्धवजी यांची “लार्जर दॅन लाईफ ” प्रतिमा दिसली पाहिजे याची त्यांचे फोटोग्राफर व्यवस्थित काळजी घेतील. या संपूर्ण दौऱ्यात उद्धवजींसमवेत मातोश्रीवरील उद्धवजींच्या कानात खुसुफुसणारे, कायम त्यांच्या मागे पुढे नाचणारे, शेतीचे पूर्ण ज्ञान नसलेले, शेतकाऱ्यांबाबत शून्य कळकळ असलेले सर्व “बडवे” सोबत असतील. हे “बडवे “शेतकऱ्यांना उद्धवजींच्या जवळ येण तर सोडाच बोलू देखील देणार नाहीत. स्वतःच महत्व वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या हे “बडवेच ” उद्धवजींना सांगतील. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेल्या या लक्झरीयस दौऱ्यात / Event मध्ये उद्धवजी स्वतःचा छंद जोपासून शेतकऱ्यांचे फोटो काढतील. त्यानंतर मुंबईत या फोटोचे प्रदर्शन भरऊन सेलिब्रिटींना आमंत्रण दिले जाईल. सेलिब्रिटी येतील… प्रदर्शन पाहतील….. उद्धवजींची फोटोग्राफी किती चांगली आहे !! याचे कौतुक करतील. त्यानंतर मातोश्रीवरील “बडवे “शिवसेना नेत्यांना व शिवसैनिकांना प्रदर्शनातील फोटों बोली लावून खरेदी करण्याचे आदेश देतील. परंतु आदेश पाळणारे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हृदयात असणारे शिवसैनिक तिथे राहिले नाहीत याची सर्वांना जाणीव आहे. तुमचे शेतकऱ्यांच्या बांधावरचे दौरे नक्की कसे असतात हे आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती नसेल म्हणून सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी तुमच्या दौऱ्याचे हे प्रवासवर्णन करत आहे… आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारी शिवसेना व शिवसैनिक ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. श्री एकनाथजी शिंदे
यांचे सोबत आहे त्यामुळे बळीराजाची काळजी घ्यायला वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना समर्थ आहे !!
म्हणूनच सांगायला अभिमान वाटतो की
१) ३ वर्षांपूर्वी आपण जाहीर केलेले नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे ५० हजार रुपये आमच्या सरकारने
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. २) भूविकास बँकेमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली.
(३) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRF पेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ४) नुकसान भरपाईसाठी 2 एकर जमिनीची मर्यादा 3 एकर केली आहे.
बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे याची जाणीव आम्हाला प्रत्येकाला आहे. बळीराजाची काळजी आम्ही आताही घेतच आहोत आणि भविष्यात देखील घेत राहू.!!

Dnyaneshwar: