नवी दिल्ली : (Uddhav Thackeray And Eknath Shinde) महाराष्ट्रातील ठाकरे-शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाला मागील पाच महिन्यापासून फक्त तारीख पे तारीख देण्याची काम उच्च न्यायालयाकडून करण्यात आलं. हा वाद कधी मिटणार याकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यामुळे शिंदे गटाने खुप कालावधी मिळाला आणि त्या काळात त्यांना अनेक नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळण्यात शिंदेंना वेळ मिळाला असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. सरन्यायधिश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्यात आलं असून देखील मुख्य सुनावणी सुरु झालेली नाही. त्याला आता कुठे सहा महिन्यानंतर मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी 10 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यापूर्वी याप्रकरणाची सुनावणी 1 नोव्हेंबर रोजी पार पडली होती. त्यावेळी दोन्ही गटांनी कागदपत्रांचा गोषवारा द्या आणि दोन्ही बाजूंनी एकत्र बसून महत्त्वाचे मुद्दे ठरवा, असं म्हणत न्यायालयानं दोन्ही पक्षकारांना 4 आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर याप्रकरणी 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र घटनापीठातील एका न्यायमुर्तींच्या गैरहजर असल्याचे कारण देत पुन्हा नवी तारीख देण्यात आली आहे.
अखेर नव्या वर्षात 10 जानेवारीपासून या प्रकरणाचा मुख्य युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता आहे. प्रकरण 13 डिसेंबरला केवळ अनौपचारिक निर्देशांसाठी ऐकलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. याच दिवशी 10 जानेवारी या तारखेवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील सरकार पडणार की, राहणार का आणखीन कोणता निकाल येतो हे पाहणं प्रतिक्षेच ठरलं आहे.