मुंबई : (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis) जवळपास चार महिन्यापुर्वी शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करुन, भाजपच्या मदतीने नवीन सरकार स्थापन केलं. त्यानंतर बंडखोरी केलेल्या आमदारांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर दावा केला. यामुळे हंगामी स्वरुपात पक्ष आणि चिन्ह गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. पक्षाचे चिन्ह आणि नाव पुन्हा आम्हालाच मिळणार असा विश्वास त्यांनी मातोश्रीवर उपस्थित बुलढाण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिला आहे.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, “धनुष्यबाण गोठवलं तरी हातातली मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. प्रत्येक चिन्हाचं एक महत्त्व असतं. रामाने धनुष्यबाणानेच रावणाला मारलं होतं. तर अन्याय जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल आपल्याकडे आहे. माझा पक्षात नाव गोठवलंत, माझं चिन्ह गोठवलंत. एवढं करूनही उमेदवार देऊन नंतर पळ काढलात. मग एवढं सगळं कशाला केलं? आपल्याला मनस्ताप द्यायचा, आपल्याला छळायचं आणि शिवसेना संपवायची यासाठी हे सगळं केलं गेलं असं,” टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी भाजपवर डागलं आहेत.