मुंबई : (Uddhav Thackeray On State Government) वेदांता-फाॅक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आल्याचे समजताच राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी करताना दिसत आहेत. या प्रकल्पाच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती पण आता त्यांनी मौन सोडत पहिल्यांदा या प्रकराणावर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, आज शिवसेना भवनात झालेल्या सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोला चढवला. वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला म्हणजे पाकिस्तानला गेला नसून, गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर प्रकल्प गुजरातला जाऊ पर्यंत राज्य सरकार काय करत होतं? असा प्रश्न ठाकरेंनी विचारला आहे. ‘मविआ’मुळे प्रकल्प गुजरातला गेला अशी टीका करण्याचं कोणी धाडस कोणी करू नये, असा दमच त्यांनी सत्ताधाऱ्यांना भरला आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार असा निर्धार ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच याबद्दल कुणी कोणताही संभ्रम ठेवू नये. येत्या 21 तारखेला शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा होणार असून, त्यासाठी शाखा स्तरावर बैठका घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळं शिवाजी पार्कच्या शिवतिर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला पालिकेची परवानगी मिळणार का हे पहाणं महात्त्वाचं ठरणार आहे.