मुंबईमध्ये ५० ते ६० लाख उत्तर भारतीय
लखनौ : मुंबईमध्ये आता उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय सुरू होणार आहे. मुंबईमध्ये राहणार्या उत्तर भारतातील लोकांना मदत करण्यासाठी मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. मुंबईंमध्ये सुमारे ५० ते ६० लाख उत्तर भारतीय राहतात. या लोकांना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या व्यवसायवाढीसाठी मदत व्हावी, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्यामुळे मुंबईत राहणार्या लाखो उत्तर भारतीय मजुरांची प्रचंड अडचण झाली होती. आता अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास मुंबईतील कार्यालयाच्या माध्यामातून उत्तर प्रदेश सरकार त्या लोकांना मदत करेल. ज्याप्रमाणे प्रत्येक देशात इतर देशांच्या दूतावासांचे कार्यालय असते आणि ते ज्या पद्धतीने काम करते त्याच पद्धतीने हे कार्यालय स्थानिक पातळीवर काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईमध्ये असंघटित क्षेत्रात काम करणार्या उत्तर भारतीयांची संख्या खूप मोठी आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये याच असंघटित कामगारांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्णाण झाला होता. या प्रस्तावित कार्यालयातून मुंबईत राहणार्या उत्तर भारतीयांना उत्तर प्रदेशातील विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटन, लघुउद्योग, मध्यम उद्योग या आणि अनेक गुंतवणुकींचा समावेश असेल. या लोकांनी तयार केलेल्या मालाला उत्तर प्रदेशात आणि देशातील इतर भागांमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. उत्तर प्रदेशच्या या कार्यलयाच्या माध्यामातून इथे राहणार्या उत्तर प्रेदेशातील लोकांचा उत्तर प्रदेश सरकारसोबत समन्वय वाढण्यास मदत होईल. मुंबईत राहणार्या उत्तर भारतीयांना काही सरकारी अडचणी आल्यास हेच कार्यालय महाराष्ट्र सरकारशी समन्वय साधणार आहे.