अहमदनगर | Ahmednagar – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे. आता अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर (Ahilyanagar) असं झालं असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज (31 मे) नगर येथील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांचं नाव हिमालयाएवढं मोठं आहे. शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी अहिल्यादेवी यांनी खूप काही केलं आहे. त्यामुळे अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. तसंच आमच्या सरकारच्या काळात हा मोठा निर्णय होत असल्यानं हे आमचं भाग्यच आहे. तर आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं आम्हाला भाग्य मिळालं.”
28 मे 1490 रोजी अहमदनगर शहराची स्थापना झाली. या शहराची स्थापना अहमद बादशाहनं केली. नुकतीचं या शहराच्या स्थापनेला 532 वर्ष पूर्ण झाली आहेत. तसंच मलिक अहमद निजामशहाच्या नावावरून अहमदनगर हे नाव पडलं होतं. तर अहमदनगरच नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून करण्याची मागणी केली जात होती.
याआधी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केली होती. त्यांनी राज्यात मविआचं सरकार असताना त्यावेळीच्या मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात एक पत्र देखील लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या अवघ्या हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. ज्यावेळी मुघल, निजामशाहीत हिंदूसंस्कृतीवर हल्ले होत होते त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. त्यांनी अनेक बारव बांधले, मंदिरांचं पुनर्निर्माण केलं, स्त्रीयांना सन्मान मिळवून दिला.”